फलटण (आपलं फलटण)
कृषी विभागाच्या वतीने सासकल (ता. फलटण, जि. सातारा) येथे ‘एल निनो’ विषयावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शेतकरी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीचे नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या फेरीत ज्येष्ठ शेतकरी वामन मुळीक, मनोहर मुळीक, ज्ञानदेव मुळीक, सिताराम मुळीक यांच्यासह प्रगतिशील शेतकरी व महिला सहभागी झाल्या.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी शहाजी शिंदे व उप कृषी अधिकारी अजित सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी ‘एल निनो’मुळे मान्सून पावसात घट किंवा अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे विशेषतः खरीप हंगामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पिकांचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपाययोजनांवर भर
शिवार फेरीदरम्यान शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कमी पाण्यावर येणारी बाजरी, ज्वारी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, तूर व मूग यांसारखी पिके घेण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच मान्सूनच्या अंदाजानुसार पेरणीची वेळ बदलणे व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला.
जल व्यवस्थापनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर, मल्चिंगद्वारे जमिनीतील ओलावा टिकवणे आणि शेततळ्यांद्वारे पाणी साठवणूक करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यासोबतच सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीची सुपीकता टिकवणे व कीड-रोग नियंत्रणासाठी नियमित निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला.
हवामान अंदाज व पीक विम्याचे महत्त्व
‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ अंतर्गत पिकांचा विमा काढण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांचा नियमित अभ्यास करून शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या शिवार फेरीत सासकलसह पंचक्रोशीतील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.





