फलटण( आपलं फलटण ) फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त MIDC उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी केली. आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी यासाठी मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी MIDC सुरू करण्याचे आदेश दिले असून “एकनाथ शिंदे यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे,” असे सांगत MIDCचे काम पूर्ण होणारच, असा ठाम विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना योग्य मोबदला दिला जाईल आणि शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती अथवा नाडून जमीन अधिग्रहण केले जाणार नाही, तर शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना हवे ते देऊनच औद्योगिक वसाहतीचा विस्तार केला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.
फलटण येथील अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी निवड आढावा बैठक, BLA-2 नोंदणी अभियान तसेच सातारा जिल्हा परिषद, फलटण पंचायत समिती आणि फलटण नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना सदस्यांच्या संयुक्त सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, माजी खा. राहुल शेवाळे, संजीवराजे ना.निंबाळकर, ॲड. अनिकेतराजे ना.निंबाळकर,विश्वजीतराजे ना.निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, युवासेना संपर्कप्रमुख सुजित खुडे, संपर्कप्रमुख विराज खराडे, फलटण तालुकाप्रमुख नानासाहेब तथा पिंटू ईवरे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, माजी सभापती शंकरराव माडकर, उपसभापती अमोल सस्ते, सह्याद्री कदम, रेश्मा भोसले, वैशालीताई कांबळे, ज्योती मोरे, माण तालुका संपर्कप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांच्यासह फलटण, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामंत पुढे म्हणाले, संजीवराजे यांनी उभी केलेली पोटॅशियम बनवणारी कंपनी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. पोटॅशियम उत्पादन व पुरवठा क्षेत्रात फलटण तालुक्याने जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. या कारखान्याच्या निर्यातक्षम उत्पादनाची आणि रोजगारनिर्मितीची माहिती आपण स्वतः आज कारखान्याला भेट देऊन घेतली. या कंपनीला विस्तारासाठी जागेची आवश्यकता भासल्यास MIDCमध्ये प्राधान्याने जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यातून फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल.”
पश्चिम महाराष्ट्र साखर उत्पादनात आघाडीवर असल्याचे आपण पाहिले; मात्र पोटॅशियम उत्पादनात जगात तृतीय क्रमांकाचा कारखाना फलटणमध्ये आहे, ही फलटणकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
एका लोकसभा मतदारसंघात १६ हजार ५०० बूथ प्रमुख काम करणार आहेत. राज्यातील लाखो BLA व बूथप्रमुखांना संरक्षण देण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. लवकरच त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम पक्षपातळीवरून राबवला जाईल. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात १०० टक्के BLA-2 नियुक्ती पूर्ण झाली असून आगामी काळात शाखाप्रमुख नियुक्त्यांमुळे पक्षसंघटना आणखी मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेत तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते, असे सांगत सामंत यांनी शिवसेनेची शाखाप्रमुखांची रचना अटल बिहारी वाजपेयी आणि शरद पवार यांनीही स्वीकारून पक्ष वाढवला, असे नमूद केले. माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील यांनी बूथ लेव्हलचे काम उत्कृष्ट केले असून ते पक्षासाठी आदर्शवत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
फलटण तालुक्यात पूर्वी पक्ष संघटना अस्तित्वात होती; मात्र तिची अवस्था काय होती हे आम्हाला माहिती असल्याचे सांगताना सामंत म्हणाले, “संजीवराजे यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आम्हाला येथे रेडीमेड पक्षसंघटना मिळाली. तुमच्या येण्यामुळे पक्षाची ताकद वाढली असून फलटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेत शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. आगामी काळात धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी येथे शिवसेना प्रमुख पक्ष असेल. किंबहुना फलटणचा आमदार शिवसेना पक्षाचाच असेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “पक्षामध्ये गटबाजी आणि मतभेदाला थारा नाही. निवडलेले पदाधिकारी हे कार्यकर्त्यांना ताकद देणारे असले पाहिजेत. जिल्हाप्रमुख, आमदार आणि खासदार यांच्या गाडीचे दरवाजे उघडणारे नव्हे, तर स्वतःचा दरारा निर्माण करणारे पदाधिकारी पक्षाला हवेत. जिल्हाप्रमुखाने बूथप्रमुखालाही मान दिला पाहिजे, कारण त्यांच्या ताकदीवरच जिल्ह्याचा डोलारा उभा राहणार आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारातून BLA आणि त्यांच्या कुटुंबांना पूर्ण संरक्षण देऊन शिवसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत सामंत म्हणाले, “देशात तळागाळातील कार्यकर्ता आणि त्याच्या कुटुंबाची काळजी घेणारे नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे. ते दररोज १८ ते २० तास काम करतात. तुम्ही पक्षासाठी फक्त दोन तास द्या, आगामी काळात शिवसेना महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष असेल.”
महाराष्ट्रातील १३६ मतदारसंघांचा दौरा करून पक्ष विस्तार, पदाधिकारी निवड, शासकीय समित्या व जिल्हा नियोजन विकास मंडळावरील नियुक्त्यांबाबतचा सविस्तर अहवाल आपण आणि माजी खासदार राहुल शेवाळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचे सांगत, “कोणाचा उजवा-डावा याचा विचार न करता पक्षासाठी वेळ देणाऱ्या आणि संघटना मजबूत करणाऱ्या शिवसैनिकांना संधी दिली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात संजीवराजे यांनी फलटणच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य शिवसेनेच्या माध्यमातून निवडून आल्याचे सांगत आगामी काळात पक्ष अधिक प्रबळ करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही जोमाने काम करण्याची ग्वाही दिली. प्रारंभी त्यांनी ना. उदय सामंत, राहुल शेवाळे, खा. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख अजित जाधव यांच्यासह सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी चंद्रहार पाटील, विराज खराडे, सौ. रेश्मा भोसले, बाळासाहेब मुलाणी यांची समयोचित भाषणे झाली. तसेच नवनिर्वाचित उपसभापती अमोल सस्ते यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
◼️ “मला पद मिळणार म्हणून शिवसेनेचा वापर चालणार नाही”; सामंतांचा अप्रत्यक्ष इशारा
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता उदय सामंत यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. “काही लोक सांगतात, माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाहीत. मी सांगेल तेच पदाधिकारी होतील. पण पुढच्या आठवड्यात मी आणि राहुल शेवाळे त्या मतदारसंघात जाणार आहोत. कोण पदाधिकारी करायला देत नाही ते आम्ही पाहणार आहोत,” असे सांगत त्यांनी थेट इशारा दिला.
“कोणामध्ये कितीही घमेंड असेल तरी आम्ही ठाण मांडून बसू आणि सगळे BLA करून दाखवू. कितीही मोठा नेता असला तरी पक्षसंघटना उभी करूनच दाखवू,” असे सामंत यांनी ठणकावले.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये महेश शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसेनेत नाराजी निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर सामंत यांच्या विधानाकडे विशेष राजकीय महत्त्वाने पाहिले जात आहे.
“समोरच्या पक्षाबरोबर संबंध ठेवू नका असे आम्ही म्हणणार नाही; मात्र ते संबंध शिवसेनेला बाधक ठरणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. मला काहीतरी पद मिळणार आहे, काहीतरी फायदा होणार आहे म्हणून शिवसेनेचा वापर कोणी करणार असेल तर ते यापुढच्या काळात चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
“शिवसेनेने तुम्हाला भरभरून दिले आहे, आता शिवसेनेला देण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. झोकून देऊन काम करा,” असे आवाहन करत सामंत यांनी आगामी पदाधिकारी निवडींसाठी कठोर संदेश दिला.
◼️ चौकट
नामदार उदय सामंत मार्गदर्शन करीत असताना कार्यकर्त्यांनी “संजीवराजेंना आमदारकी द्या” अशी जोरदार मागणी केली. त्यावर सामंत म्हणाले, “याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही; मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर तुमच्या भावना पोहोचवतो. याबाबतीत अंतिम निर्णय तेच घेतील.”






