फलटण (आपलं फलटण)फलटण-कोरेगाव मतदारसंघात वन्य प्राण्यांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत केली.
तालुक्यात बिबट्या आणि रानडुकरांनी ठिकठिकाणी उच्छाद मांडला आहे. रानडुकरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत असून बिबट्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, परिसरात पूर्वी कधीही न दिसणाऱ्या रानगव्याने २७ तारखेला विडणी येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विधानसभेत तसेच वनमंत्र्यांकडे केलेल्या मागणीत आमदार पाटील यांनी सांगितले की, एकट्या फलटण तालुक्यात रानडुकरांमुळे आतापर्यंत 25ते 30 पशुधनांचा बळी गेला आहे. यावर्षी सुमारे 350 शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसानीचे पंचनामे होत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तातडीची व पुरेशी आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
मतदारसंघातील वेळोशी, वाघोशी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, गिरवी, उपळवे, ताथवडे या डोंगरकपारीतील गावांमध्ये वन्य प्राण्यांचा अधिकचा वावर आहे. शेतकरी शेतात जाण्यासही घाबरत आहेत. कष्टाने उभे केलेले पीक रातोरात उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.
डोंगराळ भागातील शेतीभोवती तातडीने सोलर झटका पंप उपलब्ध करून द्यावेत, तसेच डोंगरकडेला खोल चर खोदून रानडुकरांचा प्रवेश रोखावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. ज्या भागात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे, त्या ठिकाणी वनक्षेत्राला कायमस्वरूपी कुंपण घालणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
2025-26 या कालावधीत बिबट्याने पशुधनावर हल्ला केल्याची सात प्रकरणे नोंदली गेली असून वन विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना 82 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. मात्र ही मदत अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्र प्रमाणेच जिल्ह्यात स्वतंत्र बिबट निवारा केंद्र स्थापन करावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव, अपुरी नुकसानभरपाई आणि संरक्षणाच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे फलटण-कोरेगाव परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.हा ज्वलंत प्रश्न आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत मांडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.






