फलटण( पोपट मिंड) फलटण शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून दारू, गांजा, मटका, गुटखा विक्रीपासून ते टपोरेगिरी, छेडछाड, वाहतूक नियमभंग आणि अनैतिक व्यवसायापर्यंत अनेक प्रकार उघडपणे सुरू असल्याचे चित्र आहे. स्वतंत्रपणे शहर पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या दिमतीला पोलीस फौज फाटा असूनही फलटण शहर व तालुक्यात अनेक अवैद्य धंदे बोकाळले आहेत अवैध धंदेवाले पोलिसांना लक्ष्मी दर्शन देत असल्याने दिवसेंदिवस संबंधित लोकांची मुजोरी वाढत चालली आहे का? तालुक्याला खमक्या अधिकाऱ्याची साथ लाभण्याची आवश्यकता आहे. वाढत्या बेकायदेशीर कारवायांवर लगाम बसवणे हे पोलीस प्रशासनासमोर सध्या तरी मोठे आव्हान ठरत आहे.
शहर व तालुक्यात जुगार, मटका, बंदी असलेला गुटखा, अवैध दारू व गांजा विक्री राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गावोगावी दारूचा पुरवठा दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनांद्वारे होत असल्याची चर्चा आहे. महामार्गालगतच्याच नव्हे तर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यालगच्या ढाब्यांवर सहज दारू उपलब्ध होत असल्याने कायद्याचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांत आहे.
मोबाईलच्या माध्यमातून मटका आणि जुगाराचे जाळे अधिक मजबूत झाले आहे. चक्रीचे तर चकारच सुरू आहे ‘घरपोच सेवा’ देणारे अवैध धंदेवाले सक्रिय असल्याचेही सांगितले जाते. रोज लाखोंची उलाढाल होत असताना कारवाई मात्र अपुरी असल्याची टीका होत आहे. कारवाईसाठी कोणीतरी तक्रार करण्याची वाट पोलीस प्रशासन पहात असतात पोलीस प्रशासनाला सर्वकाही दिसत असूनही डोळ्यावर पट्टी बांधून राम भरोसे कारभार सुरू असल्याच्या चर्चा वाढल्या आहेत.
दिवसाढवळ्या महिलांच्या दागिन्यांची चोरी, व्यापाऱ्यांना धमक्या, किरकोळ कारणांवरून विद्यार्थ्यांवर व व्यावसायिकांवर मारहाण अशा घटना वाढल्या आहेत. गुन्हे दाखल होतात; मात्र तपासाबाबत ‘तपास सुरू आहे’ हेच उत्तर वारंवार मिळत असल्याने जनतेत नाराजी आहे.
शहरातील काही मेडिकलमधून नशेच्या गोळ्यांची विक्री, लॉजवर सुरू असलेला अनैतिक व्यवसाय आणि वाढती गांजा विक्री यामुळे अल्पवयीन मुले मुली गुन्हेगारीकडे वळत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शांत व सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या फलटणची प्रतिमा मलिन होत चालल्याची खंत व्यक्त होत आहे.
शाळा, महाविद्यालये, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओंवर प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार आहे. महिलांना भयमुक्त वातावरणात वावरणे कठीण होत असल्याची भावना वाढीस लागली आहे. विनयभंगासारख्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही किंवा गुन्ह्याची उखलच होत नसेल तर तक्रार तरी कशाला करायची? अशी उदासीनतेची भावना जनतेत वाढू लागली आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ही भयानक बाब आहे याचा कधी स्फोट होईल हे सांगता येत नाही
नंबर प्लेट नसलेल्या गाड्या, अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालविणे, कर्कश सायलेन्सरचा वापर, मध्यरात्री वाढदिवस साजरे करत फटाके वाजवणे—हे प्रकार नित्याचे झाले आहेत. चौकाचौकांत वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. “कायदा मोडाल तर कारवाई” अशी घोषणा होते; मात्र प्रत्यक्षात कारवाई दिसत नसल्याने पोलिसांच्या वचकाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे अवैध धंद्यांना आश्रय मिळत असल्याची चर्चा थांबवण्यासाठी प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.अवैध धंदे चालवणाऱ्यांची सखोल माहिती घेऊन कठोर कायद्यांखाली कारवाई केल्यासच धाक बसेल. राज वाढता राजकीय हस्तक्षेप तसेच गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी आवश्यक असलेली कारवाई करताना कायद्याद्वारे लागलेले निर्बंध पोलिसांना अडसर ठरत आहेत ही वस्तुस्थिती ही या वस्तूस्थितीबाबतही समाजात चर्चा ऐकायला मिळते पोलीस तरी काय करणार असे प्रश्न निर्माण होत आहेत. पोलिसांनी सातत्यपूर्ण धाडी, गुप्त माहिती संकलन आणि गुन्हेगारांवर निर्णायक कारवाई केल्यासच परिस्थितीत सुधारणा होईल, असा सूरही नागरिकांत आहे.
फलटणला खमक्या अधिकाऱ्यांची गरज आहे. खरंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांचे थांबे उध्वस्त होतील अशी जनतेला अपेक्षा होती ते समाजजीवन सुरळीत करण्यासाठी कायद्याची दहशत निर्माण करतील असा विश्वासही होता मात्र फलटण येथे उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरही त्यांच्याकडून अपेक्षित अशी कोणतीच कारवाई झाली नाही त्यांच्यातला सक्षम अधिकारी फलटणला हजर होऊन शांत झाला आहे काय? अशी सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चा आहे त्यांना नको असताना फलटण येथे मनाविरुद्ध रुजू व्हावे लागले आहे काय? असाही प्रश्न समाजमनातून विचारला जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वतः कार्यक्षमतेने सक्षमतेने कार्य करू लागले तर दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ही प्रभावीपणे त्यांना साथ देतील! पर्यायाने जनतेला अपेक्षित असलेली अवैध धंदाविरुद्धची कारवाई सहज शक्य आहे.
काहीही असले तरी सध्या तरी शहरातील व्यापारी-नागरिकांना भयमुक्त वातावरण पोलीस प्रशासन मिळवून देईल काय? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कायद्याचा बडगा उगारत गुन्हेगारीला आळा घालणे, महिलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे, वाहतूक शिस्त लावणे आणि अवैध धंद्यांवर निर्णायक कारवाई करणे—हीच आज फलटणकरांची रास्त अपेक्षा आहे. आता प्रशासन किती वेगाने आणि किती प्रभावी पावले उचलते, यावरच शहराच्या भवितव्याचा प्रश्न अवलंबून आहे.






