पुणे :प्रतिनिधी)
भारतीय सैन्यदलातील युद्धवीर, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक म्हणून ओळख असलेले माजी लष्करी अधिकारी कर्नल विनोद मारवाह (निवृत्त) यांना राष्ट्रनिर्मिती, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि माजी सैनिकांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’ प्रदान करून गौरविण्यात आले.
पुण्यात आयोजित विशेष समारंभात भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ लष्करी अधिकारी, माजी सैनिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी National Defence Academy (एनडीए), खडकवासला येथील १९६७ बॅचचे विद्यार्थी असलेले कर्नल मारवाह यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धात बॉम्बे सॅपर्स दलातून पश्चिम सीमेवर शौर्यपूर्ण सेवा बजावली. एनडीएच्या ‘बॉर्न टू बॅटल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ३८ व्या कोर्सचे ते गौरवशाली सदस्य आहेत.
१९९२ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी शिक्षण, अक्षय ऊर्जा, पर्यावरण संरक्षण, दुग्धव्यवसाय, बांधकाम आणि ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरू ठेवले. ग्रामीण महाराष्ट्रात सौरऊर्जेचा प्रसार, जलसंधारण, वृक्षारोपण आणि सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू भागांचे पुनरुज्जीवन यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मुंबई-पुणे महामार्ग परिसरातील पहिली सोलर ड्रिप इरिगेशन प्रणाली उभारण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.
मानवतावादी कार्यातही त्यांचे योगदान लक्षणीय राहिले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेत राबविण्यात आलेल्या मानवतावादी डिमायनिंग प्रकल्पात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या कुवेतमध्ये युद्धानंतर शिल्लक राहिलेल्या माईन्स आणि स्फोटक अवशेष हटविण्याच्या मोहिमेत त्यांची टीम कार्यरत असून या माध्यमातून अनेक माजी सैनिकांना पुनर्रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
सन २००० मध्ये त्यांनी IIEBM या व्यवस्थापन शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रामाणिकपणा, सचोटी, जबाबदारी आणि नेतृत्व या मूल्यांवर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे. संरक्षण दलातील जवानांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती तसेच माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे कार्यही संस्थेमार्फत सुरू आहे.
उद्योग क्षेत्रातही कर्नल मारवाह यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रसायन, जैवतंत्रज्ञान, दुग्धव्यवसाय आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील विविध उद्योगांद्वारे त्यांनी शाश्वत विकासाचे मॉडेल उभे केले आहे. त्यांच्या उपक्रमांमुळे सातारा जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ होत असून दररोज सुमारे सहा लाख लिटर दूध संकलन केले जाते.
समाजसेवेची परंपरा पुढे नेत त्यांनी कर्नल विनोद मारवाह फाउंडेशन स्थापन करून शिक्षण, आरोग्य आणि माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही भारतीय भाषा, साहित्य आणि काव्यपरंपरेच्या जतनासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
पुरस्कार प्रदान करताना जनरल द्विवेदी यांनी कर्नल मारवाह यांच्या राष्ट्रसेवा आणि समाजसेवेच्या कार्याचा गौरव करत, “माजी सैनिकांचे अनुभव, नेतृत्व आणि सेवा वृत्ती राष्ट्रनिर्मितीसाठी अमूल्य ठरते,” असे मत व्यक्त केले.
राष्ट्रसेवा, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रांत भरीव योगदान देणारे कर्नल विनोद मारवाह हे आज अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनले असून, त्यांना मिळालेला ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’ हा त्यांच्या दीर्घकालीन राष्ट्रनिष्ठ सेवाकार्याचा सन्मान मानला जात आहे.







