फलटण( आपलं फलटण)
राज्यातील सरकारच्या तसेच खत कंपन्यांच्या जाचक अटींविरोधात महाराष्ट्रातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, संबंधित मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बंदमध्ये फलटण तालुका कृषी डीलर असोसिएशन सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
कृषी सेवा केंद्र चालकांच्या म्हणण्यानुसार, खत व बियाणे विक्रीसंदर्भातील नियमांमध्ये असलेल्या त्रुटी, कंपन्यांकडून लादल्या जाणाऱ्या अटी, तसेच परवान्यांबाबतच्या प्रक्रियेत होणारा अडथळा यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांना आवश्यक खते व औषधे वेळेत उपलब्ध करून देताना अडचणी निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय, पीक संरक्षण औषधांच्या विक्रीसंदर्भातील परवान्यांचे नियम, खत कंपन्यांची जबाबदारी, तसेच शासनाच्या विविध आदेशांमधील विसंगती यामुळे विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व मुद्द्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
दरम्यान, या बंद काळात शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन काही ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार असला, तरी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
फलटण तालुका कृषी डिलर असोसिएशननेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून, शेतकरी बांधवांच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगितले आहे.








