फलटण (आपलं फलटण) गोखळी (ता. फलटण) :
परिसरात दुग्ध व्यवसायात विश्वासार्हतेचा ठसा उमटवणाऱ्या ‘निराई डेअरी’च्या पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर आता ‘निराई उद्योग समूहा’तर्फे ‘निराई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे’चा शुभारंभ करण्यात आला. पंचबिघा (गोखळी) येथे रविवारी (दि. १९ एप्रिल २०२६) अत्यंत साध्या व उत्साही वातावरणात हा उद्घाटन सोहळा पार पडला.
गोखळी गावातील सुशांत गावडे यांनी २०२१ साली अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्चशिक्षण (पोस्ट ग्रॅज्युएशन) पूर्ण करून महाविद्यालयीन प्राध्यापकाची सुखवस्तू नोकरी सोडत ग्रामीण भागात काहीतरी वेगळे करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यातूनच पंचबिघा येथे ‘निराई डेअरी’ची स्थापना झाली. सुरुवातीच्या अडचणींवर मात करत त्यांनी डेअरी व्यवसायात पारदर्शकता, शेतकरी हित आणि विश्वास या तत्त्वांवर भर दिला व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला हीच विश्वासाची शिदोरी त्यांना नवीन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी बळ देणारी ठरत आहे.
निरा नदी ही परिसरातील जनजीवनाची जीवनदायिनी मानली जाते. तिच्या उपकारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच डेअरीला ‘निराई’ हे नाव देण्यात आले. या भावनिक नात्यामुळे आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे अल्पावधीतच ‘निराई डेअरी’ने पंचक्रोशीत विश्वासार्हतेची भक्कम ओळख निर्माण केली आहे.
दूध व शेती व्यवसायाला सहकाराची जोड मिळाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल घडू शकतो, या विचारातून ‘निराई पतसंस्था’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र तालुकास्तरीय असून, गोखळी व पंचक्रोशीतील नागरिकांना कर्जसुविधा, बचत व इतर आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याचा तिचा उद्देश आहे.
यावेळी बोलताना सुशांत गावडे यांनी सांगितले की, “निराई पतसंस्थेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, लघुउद्योजक व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळेल. सहकाराच्या माध्यमातून विकासाचा नवा मार्ग खुला होईल.”
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेक सहकारी, ग्रामस्थ व हितचिंतकांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
निराई डेअरीच्या यशस्वी पायावर उभी राहणारी ही पतसंस्था ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा देईल, असा विश्वास पंचक्रोशीत व्यक्त होत आहे. यावेळी संचालक मंडळातील रामदास गावडे, योगेश गावडे, टाकळवाडी तंटा तंटामुक्ती अध्यक्ष सहदेव मिंड,श्री.रवींद्र खोमणे,श्री.भाऊसाहेब गावडे,सौ.राणी मिंड,श्री.पदमाकर गावडे,चि.अक्षय मिंड,चि.रोहन गावडे,चि.सौरभ गावडे व मान्यवर उपस्थित होते.
🟦 चौकट : सुशांत गावडे – धाडस, दृष्टी आणि ग्रामीण विकासाचा प्रेरणादायी प्रवास 🟦
गोखळी येथील सुशांत गावडे हे केवळ उद्योजक नसून ग्रामीण परिवर्तनाची जिद्द बाळगणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापकाची सुरक्षित व स्थिर नोकरी सोडण्याचा त्यांचा निर्णय हा त्यांच्या धाडसी वृत्तीचा प्रत्यय देणारा ठरला.
२०२१ साली ‘निराई डेअरी’ची स्थापना करत त्यांनी दुग्ध व्यवसायात पारदर्शकता, शेतकरी हित आणि विश्वास या मूल्यांची पायाभरणी केली. अल्पावधीतच डेअरीला मिळालेले यश हे त्यांच्या नियोजनबद्ध कामकाजाचे आणि चिकाटीचे फलित आहे.
निरा नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘निराई’ हे नाव देण्यामागील संवेदनशीलता त्यांच्या सामाजिक जाणीवेची साक्ष देते. आता ‘निराई पतसंस्था’च्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा आणखी एक महत्त्वाकांक्षी टप्पा गाठला आहे.
शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा त्यांचा हा प्रवास ग्रामीण भागातील विकासाची नवी दिशा दाखवणारा ठरत आहे.





