फलटण (आपलं फलटण) महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण येथे श्री चक्रपाणी वार्षिक यात्रेतील (घोड्याची यात्रा) मुख्य दिवस मंगळवारी उत्साहात साजरा झाला. ढोल-ताशे, लेझीम व बेंजोच्या गजरात “गोपालकृष्ण महाराज की जय” आणि “श्री चक्रपाणी स्वामींच्या नावाचा जयघोष” करत गुलालाच्या उधळणीत श्रींच्या पालखीसह मानाच्या पितळी घोड्यांची भव्य ग्रामप्रदक्षिणा पार पडली.
यात्रेनिमित्त फलटण येथील श्रीकृष्णनाथ, आबासाहेब, बाबासाहेब, जन्मस्थान (अवस्थान मंदिर), रंगशीळा व श्रीदत्त या सहा मंदिरांमध्ये राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, राजस्थान व गुजरात येथून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चैत्र पौर्णिमेपासून (दि. २ एप्रिल) सुरू झालेल्या या यात्रेत दररोज अभिषेक, गीता पठण, प्रवचन व उपहार असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. दरम्यान, २ ते ६ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी श्रीकृष्णनाथ मंदिरातून निघणारा छबिना आबासाहेब मंदिरात वाद्यांच्या निनादात दाखल होत होता.
मंगळवारी दुपारी आबासाहेब मंदिर येथे आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, संदीप चोरमले, नगरसेविका कु. सिध्दाली शहा, माजी नगरसेवक अनुप शहा, सुदामराव मांढरे, तसेच अजितराव जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते महास्थान व पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषद माजी अध्यक्ष तथा श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प. पू. आचार्य श्यामसुंदर शास्त्री विद्वांस, प. पू. सुदामराज बाबा, बाळासाहेब ननावरे, प. पू. मुरलीधरबुवा, प. पू. गोटू बुवाजी आदींसह पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूजन व आरतीनंतर दुपारी 1.30 वा.पालखी नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली. पालखीपुढे मानकरी डोक्यावर पितळी घोडे घेऊन सहभागी झाले होते. “श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंदप्रभू, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज” यांच्या जयघोषात वातावरण दुमदुमले होते. अनेक भक्तांनी पालखीसमोर लोटांगण घेत भक्तिभाव व्यक्त केला.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मेवा-मिठाई, खेळणी, नारळ व पूजासाहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. विविध तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे व सामाजिक संस्थांकडून भाविकांसाठी थंड पिण्याचे पाणी, सरबत, ताक, मठ्ठा तसेच नाश्त्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी भोजनाचीही सोय करण्यात आली होती.
दरम्यान, संपूर्ण यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात शांततेत पार पडली. नगर परिषदेकडून स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता.






