फलटण ( आपलं फलटण प्रतिनिधी) श्रीराम सहकारी साखर कारखाना यांची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. १८ मे) दुपारी १ वाजता उत्साहपूर्ण आणि तणावपूर्ण वातावरणात पार पडली. सभेमध्ये कारखाना श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना चालविण्यास देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
सभेमध्ये नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी ठरावाला समर्थन देतानाच भविष्यातील निर्णय विरोधकांनाही विश्वासात घेऊन घ्यावेत, तसेच पुढे चालविण्यास घेतल्या जाणाऱ्या इतर संस्थांचा आर्थिक बोजा कारखाना किंवा सभासदांवर पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी “यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच कारखान्याचे कामकाज केले जाईल,” असे स्पष्ट केले.
विशेष सभेची घोषणा झाल्यापासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. सभेदरम्यान माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, शिवरूपराजे खर्डेकर तसेच ॲड. नरसिंह निकम यांनी पूर्वीचा करार मध्यंतरी रद्द झाल्याने कारखाना व सभासदांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. मंत्री समिती व कोल्हापूर खंडपीठाच्या सूचनांचे पालन झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. यासोबतच सुमारे ४४ कोटी रुपयांच्या नुकसानीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या आरोपांना उत्तर देताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांकडून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा केला. सभासद व कामगारांचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सभासदांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी व जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभास्थळी अक्षरशः पोलिस छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. प्रवेशासाठी सभेची नोटीस आणि आधारकार्ड तपासूनच सभासदांना प्रवेश दिला जात होता.
उन्हाचा तीव्र तडाखा असूनही सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. सत्ताधारी राजे गटाकडून रामराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण, नगरसेवक ॲड. अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच सत्यजीतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. पूर्वीचा करार मध्यंतरी रद्द झाल्याने सभासद व कामगारांचे नुकसान होऊ नये, यासाठी शरयू कारखाना आणि श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये श्रीदत्त इंडियाकडून सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे भाडे मिळणार असल्याने त्यांना कारखाना चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
सभेचे प्रास्ताविक चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन सुखदेव बेलदार यांनी मानले. यावेळी व्हाइस चेअरमन नितीन भोसले, माजी सभापती रेश्माताई भोसले, पांडुरंग गुंजवटे यांच्यासह संचालक मंडळ, सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






