फलटण( आपलं फलटण) श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत कारखान्याच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
सभेमध्ये हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांच्यासोबत दि. १ मार्च २०२२ रोजी करण्यात आलेला भागीदारी करार रद्द करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयाकडे कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या दि. ८ जानेवारी २०२० च्या शासन निर्णयानुसार ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EOI) प्रक्रियेद्वारे कारखाना, अर्कशाळा तसेच देशी-विदेशी मद्य विभाग सहकारी किंवा खासगी तत्त्वावर चालविण्याबाबतही सभेत विचारविनिमय होणार आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. सभासद असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेने सभेसाठी अधिकृत प्रतिनिधीचे नाव पंचकमिटीकडे लेखी स्वरूपात १५ मेपर्यंत कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान, ही सभा केवळ सभासदांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली असून सभासदांव्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी करण्यात आली असून त्यासंदर्भातील पत्रही देण्यात आले आहे. विनापरवाना प्रवेशाचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
विशेष सूचनेनुसार, गणपूर्तीअभावी सभा तहकूब झाल्यास त्याच दिवशी अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी पुन्हा सभा घेण्यात येणार असून त्यावेळी गणपूर्तीची आवश्यकता राहणार नसल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.






