फलटण (आपलं फलटण )विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले दिव्यांग बांधवांचे बेमुदत उपोषण अखेर तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर मागे घेण्यात आले. तहसीलदारांच्या हस्ते सरबत देऊन आंदोलनकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते
गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणादरम्यान दोन दिव्यांग बांधवांची प्रकृती खालावली होती. दरम्यान, प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या बहुतेक मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
चर्चेदरम्यान संजय गांधी श्रावणबाळ योजनेसाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती, दिव्यांग बांधवांच्या जागेच्या प्रश्नावर बैठक आयोजित करणे, दिव्यांगा बाबत सहानभोवतीची भूमिका न घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना समज देणे, अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करणे तसेच रस्त्याच्या प्रश्नांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सकारात्मक भूमिका घेत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत तोडगा काढल्याने उपोषणाची यशस्वी सांगता झाली.






