आपलं फलटण : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत विठ्ठलवाडी येथे गोठ्याची व प्राण्यांच्या निवाराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याविषयी प्रात्यक्षिकासह जनजागृती केली.
यावेळी कृषीदूतांनी शेतकऱ्यांना गोठ्यातील कचरा व विष्ठा नियमितपणे साफ करण्याचे महत्त्व पटवून दिले. जनावरांच्या वापरातील जागा स्वच्छ धुवून निर्जंतुकीकरण करणे, गोठ्यात खेळती हवा राहील याची काळजी घेणे तसेच पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वच्छ व निर्जंतुक गोठ्यामुळे जनावरांमध्ये रोगांचा प्रसार कमी होतो, दूध उत्पादनाची गुणवत्ता सुधारते तसेच विविध संसर्गजन्य आजारांपासून जनावरांचे संरक्षण होते, अशी माहिती कृषीदूतांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे तसेच पशुपालन व दुग्धशास्त्र विषय मार्गदर्शक प्रा. एस. आर. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
यावेळी कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, धीरज पाटील, ओंकार गारगोटे, सोहम गरड, वैभवराज सुरवसे व तुषार ठेंगल यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर केले.
“स्वच्छ गोठा हीच निरोगी पशुधनाची गुरुकिल्ली असून, शाश्वत दुग्धव्यवसायासाठी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाला पर्याय नाही,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.





