फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा)
येथील शरयु साखर कारखाना आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी सज्ज होत असून, ऊस तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ आज कारखाना परिसरात समारंभपूर्वक करण्यात आला. वाहन ठेकेदारांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळ्याने हंगामाच्या तयारीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
कारखान्याच्या व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गाळप क्षमतेत लक्षणीय वाढ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सुमारे १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानुसार नियोजनबद्ध हालचाली सुरू आहेत.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह लगतच्या भागातील ऊस नोंदणीचे काम शेती विभागामार्फत वेगाने सुरू असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस शरयु साखर कारखान्याकडे नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊस तोडणी व वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, सातारा-फलटण मार्गावरील रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. परिसरातील इतरही रस्ते सुधारल्याने ऊस वाहतूक अधिक सुसूत्र होणार असून, वेळेची बचत आणि कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
शेती विभागाने स्थानिक वाहनधारकांनाही आवाहन केले असून, त्यांनी वाहतूक करार करून या गळीत हंगामात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे सांगितले आहे.
या कार्यक्रमास संचालक अविनाश भापकर, युनिट हेड विजय जगदाळे, शेती अधिकारी अशोक घाडगे, रमेश वाघ, डॉ. गणपत सावंत यांच्यासह कारखान्याचे विभाग प्रमुख, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.







