विडणी (आपलं फलटण)
विडणी ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी सर्व जागांवर विजय मिळवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. “ही निवडणूक साधी नाही, तर स्वाभिमान, विकास आणि सत्तेवरील हक्क सिद्ध करण्याची लढाई आहे,” असे सांगत त्यांनी विडणीकरांना एकजुटीचे आवाहन केले.
ग्रामपंचायतीचे नऊ सदस्य अपात्र ठरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत काहींना मैदान मोकळे असल्याचा भ्रम झाला आहे. मात्र, “विडणी अजून जिवंत आहे आणि विडणीकर जागे आहेत,” असा इशारा देत अभंग यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील वाडी वस्ती पिंजून काढत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, विकास आघाडीने घराघरात संपर्क मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर गाठून मतदारांशी संवाद साधत “विकास हवा की केवळ आश्वासनं?” असा थेट सवाल केला जात आहे.
लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी आपल्या स्पष्ट शब्दांत सडेतोड मत व्यक्त करताना म्हटले आहे की “एकही जागा सोडायची नाही… सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवायचाच!” या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, गावात ठिकठिकाणी बैठका, कोपरा सभा आणि जनसंपर्क मोहिमा जोरात सुरू आहेत.
दीर्घकाळ केवळ राजकारण करणाऱ्यांना आता विडणीकर उत्तर देतील, असा विश्वास व्यक्त करत अभंग यांनी, “कोणाच्याही बापाचं राज्य नाही; निर्णय फक्त विडणीकरांचा होणार,” असे ठणकावले.
दरम्यान, या निवडणुकीत ‘सर्व जागांवर भगवा’ हे एकमेव लक्ष्य ठेवून विकास आघाडी मैदानात उतरली आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, गावातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.
विडणीतील ही पोटनिवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, गावाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. “विडणी ठरवणार… आणि इतिहास घडवणार,” या घोषणेसह गावात निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगला आहे.






