फलटण( आपलं फलटण)
श्रद्धेच्या पवित्र नावाखाली सुरू असलेल्या दांभिकतेच्या उन्मादाने समाजमन अस्वस्थ झाले असून, ज्योतिबा डोंगर व नाईकबा डोंगरावरील धक्कादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे झालेल्या ३७ व्या साहित्यिक संवादात साहित्यिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत या प्रवृत्तीवर जोरदार हल्लाबोल केला.
मंदिरातच भक्ताला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, तर दुसरीकडे भोंदूबाबांच्या चरणी राजकीय नेत्यांची नतमस्तक वृत्ती—या विरोधाभासातून समाजातील दुटप्पीपणा चव्हाट्यावर आल्याची भावना व्यक्त करण्यात आली. “दांभिकतेचा उन्माद” या विषयावर झालेल्या या संवादात वास्तवाला भिडणारे विचार मांडले गेले.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. सुधीर इंगळे यांनी शिक्षित व सक्षम घटकच अशा प्रवृत्तींचे पोषण करत असल्याचा थेट आरोप करत, “ही प्रवृत्ती आपल्या मानसिकतेतील दोषांचे प्रतिबिंब आहे. बदल हवा असेल, तर विचारसरणी बदलावी लागेल,” असा स्पष्ट इशारा दिला.
माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी अस्वस्थ काळात साहित्यिकांनी गप्प न बसता लेखणी उगारण्याचे आवाहन करत, “जग अस्थिरतेत ढकलले जात असताना आपण मात्र बुवाबाजीला खतपाणी घालत आहोत. सत्य मांडण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे,” असे ठणकावले.
प्रा. श्रेयस कांबळे यांनीही दांभिकतेच्या वाढत्या उन्मादाबद्दल चिंता व्यक्त करत कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली. “सामाजिक स्वास्थ्य टिकवायचे असेल, तर लेखणीनेच या प्रवृत्तीवर प्रहार झाला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आप्पा तांबे यांनी ‘तरडगावचा आप्पा’ या कथेद्वारे ग्रामीण भागातील बुवाबाजीचे वास्तव जिवंत करत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.
या वेळी माधुरी जगदाळे, सविता तांबे, प्रमोद सस्ते, आप्पासाहेब तांबे, प्रा. विकास शिंदे, राजाभाऊ काकडे, सचिन जाधव, महादेव गायकवाड, योगेश जगदाळे, अनिल सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.






