फलटण ( आपलं फलटण) : फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीनंतर ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत भाजप ओबीसी आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष सागर कांतिलाल अभंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सभापती पद ओबीसी समाजासाठी आरक्षित असतानाही त्या समाजाच्या भावनांचा अवमान झाल्याचा आरोप करत त्यांनी या निवड प्रक्रियेचा जाहीर निषेध नोंदविला.
या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सागर अभंग यांनी म्हटले आहे की, पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण असताना त्या समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखी घटना घडली. ही बाब अत्यंत निंदनीय असून ओबीसी समाजावर झालेला हा अन्याय मन सुन्न करणारा आहे.
या घटनेचा निषेध व्यक्त करत आपण फलटण तालुका भाजप ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली. “मी पक्षाचा नाही, माझ्या ओबीसी समाजाचा आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
अभंग यांनी पुढे स्पष्ट केले की, या निर्णयामागे कोणत्याही नेत्यांविषयी किंवा पक्ष नेतृत्वाविषयी वैयक्तिक राग नाही. मात्र ओबीसी समाजाला सभापती पदाचे आरक्षण असतानाही त्या समाजावर अन्याय का झाला, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या संपूर्ण निवड प्रक्रियेचा निषेध म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
सागर कांतिलाल अभंग हे विडणी येथील लोकनियुक्त सरपंच असून भाजप ओबीसी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारीही ते सांभाळत होते. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
“ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा”
“सभापती पद ओबीसी समाजासाठी आरक्षित असताना त्या समाजावर अन्याय झाला आहे. ही बाब मी सहन करू शकत नाही. त्यामुळे या निवडीचा निषेध करत मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा कोणत्याही नेत्यांवर राग नाही; परंतु माझ्या समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात मी ठामपणे उभा आहे.”
— सागर कांतिलाल अभंग,
अध्यक्ष, भाजप ओबीसी आघाडी, फलटण तालुका






