फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)
सुरवडी( ता. फलटण )गावच्या १५ फाटा परिसरातील काळू-बाळू वस्ती येथे असलेला ६५ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अपुरा पडत असल्याने शेतकरी व नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वीज वापराच्या तुलनेत ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी पडत असल्याने तांत्रिक बिघाड वाढले असून ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटनाही घडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरातील शेतकरी व वीज ग्राहक गेल्या तीन वर्षांपासून १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी करत आहेत. मात्र अद्यापही संबंधित विभागाकडून या मागणीची दखल घेण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर ट्रान्सफॉर्मरवर शेतीपंप, घरगुती वीज वापर तसेच इतर अनेक जोडण्या असल्याने त्यावर अतिरिक्त भार येत आहे. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन शेतीची कामे विस्कळीत होत आहेत. तसेच दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी २०२३ मध्ये या ठिकाणी १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. मात्र त्यानंतरही प्रस्तावावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
महावितरण प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सुरवडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.
चौकट : तीन वर्षांपासून मागणी प्रलंबित
सुरवडीच्या काळू-बाळू वस्ती परिसरातील वीज ग्राहकांनी गेल्या तीन वर्षांपासून १०० केव्ही ट्रान्सफॉर्मरची मागणी लावून धरली आहे. मात्र अद्यापही प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.






