फलटण : विद्यार्थी दशेत असताना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता, विविध स्पर्धांमधून केलेल्या लेखनाचे सखोल आकलन करून ते दैनंदिन जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सौ. अश्विनी वैद्य यांनी केले. मातृभाषेवर नितांत प्रेम असणे गरजेचे असून, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.महात्मा एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ या कार्यक्रमात इंग्लंडस्थित ‘महाराष्ट्र मराठी मंडळ’च्या सदस्या सौ. अश्विनी वैद्य प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
इंग्लंडमध्ये स्थायिक असतानाही मराठी भाषा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी तेथील मराठी कुटुंबे ‘महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या माध्यमातून एकत्र येतात. पुस्तक वाचन, कविता वाचन, कथा सादरीकरण अशा विविध उपक्रमांद्वारे मराठीचे संवर्धन केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. स्पर्धेच्या युगात इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक असले, तरी मराठीशी असलेली नाळ तुटू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. अवांतर वाचनाची सवय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालते आणि मराठीचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यास मदत करते, असे सांगत त्यांनी आपली ‘शब्द’ ही स्वरचित कविता सादर केली.
प्रा. अनंत डोईफोडे यांनी मराठी भाषेच्या प्रवासावर प्रकाश टाकला. संत परंपरेतून मराठीची समृद्धी घडली असून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ओव्या-अभंगांतून मराठीची गोडी आणि वैभव दिसून येते, असे त्यांनी सांगितले. संस्कृत ही जननी मानली जात असली, तरी प्राकृतच्या संस्कारातून आधुनिक मराठीची निर्मिती झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमिक शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी अध्यक्षीय भाषणात या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. इंग्रजीचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डोईफोडे आणि सातासमुद्रापार मराठीचे संवर्धन करणाऱ्या त्यांच्या कन्या सौ. वैद्य यांची एकाच व्यासपीठावर उपस्थिती हा ‘दुग्धशर्करा योग’ असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी भाषा ही केवळ शासकीय सोहळ्यांनी नव्हे, तर जात्यावरच्या ओव्या, शेतातील भलरी गीते आणि संतांच्या अभंगांनी समृद्ध झाली आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक मनीष निंबाळकर व भिवा जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन उपशिक्षक किशोर पवार यांनी केले, तर कार्यवाह व लेखक अमर शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमान आणि जाणीव निर्माण झाली.






