फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा )फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वीज समस्यांवर आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या ढिसाळ कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. अपुरा वीजपुरवठा, पूर्वसूचनेशिवाय होणारी तासन्तास वीज खंडित, चुकीची वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि वारंवार होणाऱ्या डीपी चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात ठामपणे मांडला.
आमदार पाटील म्हणाले की, महाराष्ट्रासह फलटण-कोरेगाव मतदारसंघात महावितरणचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. ग्रामीण भागात कोणतीही पूर्वकल्पना न देता आठ ते दहा तास वीज गायब होत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. घरगुती ग्राहकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
याशिवाय चुकीची वीजबिले देऊन ग्राहकांकडून जादा वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे हजारो ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.
फलटण तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वीज वितरणासाठीच्या डीपी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. चोरी झालेल्या डीपी वेळेत बसविल्या जात नाहीत, तर चोरट्यांचाही माग काढण्यात पोलीस व महावितरण अपयशी ठरत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे आमदार पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर तातडीने संयुक्त मोहीम राबवून डीपी चोरी रोखावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
स्मार्ट मीटरच्या सक्तीवरही आमदार पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. ग्राहकांना विश्वासात न घेता मीटर बसविले जात असून, रिचार्ज संपताच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट मीटरबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी आणि ग्राहकांच्या संमतीनंतरच ते बसविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
अध्यक्षांच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन करत आमदार सचिन पाटील यांनी फलटण-कोरेगाव मतदारसंघातील महावितरणच्या सर्व समस्या तातडीने सोडवून शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी विधानसभेत केली.
आपलं फलटण वृत्ताची दाखल :फलटण तालुक्यातील वीज वितरणासाठीच्या डीपी चोरीमुळे महावितरणला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, शेतकरी अंधारात राहत असल्याचा मुद्दा आपलं फलटण अंकात ठळकपणे प्रसिद्ध केला होता. आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत डीपी चोरीचा प्रश्न विशेषत्वाने उपस्थित करत महावितरणच्या निष्काळजी कारभाराचे वाभाडे काढले. डीपी चोरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणेला जाब विचारत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यामुळे माध्यमांनी उपस्थित केलेला समस्यांचा प्रश्न थेट विधानसभेत पोहोचल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली.






