फलटण (आपलं फलटण) – महिला व बालकल्याण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आणि निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या सौ. वैशाली कृष्णाथ चोरमले यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ चा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हा सन्मान वितरित करण्यात आला.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकड, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. चोरमले यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवून ठोस कामगिरी केली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी आयोजित केलेले जनजागृती उपक्रम, महिलांच्या आरोग्यासाठी सर्वरोग निदान शिबिरे, आरोग्यविषयक व्याख्याने आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे. गौरी सजावट स्पर्धा यांसारख्या उपक्रमांमधून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
बालकल्याण क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून त्यांनी दिव्यांग मुलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. दिव्यांग मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, तसेच त्यांना शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत.
विशेष म्हणजे, कोणतेही शासकीय अनुदान न घेता गेल्या १५ वर्षांपासून सुमारे ४० मूकबधिर मुलांसाठी वसतिगृहाची उत्तम व्यवस्था त्यांनी उभी केली आहे. या वसतिगृहात निवास, शिक्षण आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.
महिला व बालकल्याण क्षेत्रातील या सर्वसमावेशक कार्याची दखल घेत सौ. वैशाली चोरमले यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, त्यांच्या कार्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना नवी दिशा मिळत आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.






