फलटण (आपलं फलटण) शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी फलटण नगरपरिषद प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगरपरिषद हद्दीतील ज्या नागरिकांनी बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले आहेत, त्यांनी 27 एप्रिल 2026 पर्यंत ते स्वतःहून नियमित करून घ्यावेत, अन्यथा संबंधित कनेक्शन कायमचे बंद करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे.
Bनगरपरिषदेकडून अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात कठोर भूमिका घेतली असून, नागरिकांना एक प्रकारची अंतिम संधी देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत नागरिकांनी स्वतःहून नगरपालिकेकडे नोंदणी करून कनेक्शन नियमित केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. मात्र, मुदत संपल्यानंतरही नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नसून, त्यांचे कनेक्शन थेट बंद करून नियमानुसार दंड ठोठावला जाणार आहे.
याशिवाय, शहरातील सर्व सार्वजनिक नळ कनेक्शन देखील कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक नळांवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून दोन ते पाच जणांच्या गटासाठी ‘ग्रुप नळ कनेक्शन’ योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
शहरातील नागरिकांना वेळेत व पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी नगरपरिषद विविध उपाययोजना राबवत आहे. पाणीपुरवठा अधिक नियमित व सुरळीत करण्याच्या दृष्टीनेच हा निर्णय घेतल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्पष्ट केले. आगामी काळात फलटण शहरातील सर्व भागांना शिस्तबद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
नागरिकांसाठी आवाहन :
ही अंतिम संधी गमावू नका! बेकायदेशीर नळ कनेक्शन त्वरित नियमित करून भविष्यातील त्रास, दंड आणि पाणीपुरवठा खंडित होण्याचा धोका टाळा. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा आणि शहराच्या पाणी व्यवस्थेला सक्षम बनवा.






