मायणी (आपलं फलटण)
मायणी येथील भारतमाता विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या पाच माजी विद्यार्थ्यांनी पोलिस भरतीत उल्लेखनीय यश संपादन करत पोलिस दलात दमदार प्रवेश मिळवला आहे. या यशामुळे मायणी परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
वैशाली रामचंद्र देशमुख, अक्षय संजय पोरे, अर्जुन अनिल साळुंखे, निलेश सुनील माळी आणि शंतनु गजेंद्र कांबळे या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले. त्यांच्या या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
मायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी परिसरातील मान्यवर, शिक्षक व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुरेंद्र गुदगे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असून, त्यातूनच असे गुणवंत विद्यार्थी घडत आहेत. विविध क्षेत्रात यश मिळवणारे विद्यार्थी हीच संस्थेची खरी संपत्ती असून, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
ग्रामीण मातीतून पोलिस दलात स्थान मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या यशामुळे इतर युवकांनाही नवी प्रेरणा मिळणार असून, भारतमाता ज्युनियर कॉलेजचा लौकिक आणखी उंचावणार आहे.






