फलटण( आपलं फलटण)
जिंती येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची औपचारिक स्थापना करण्यात आली असून, या उपक्रमामुळे शाळा आणि माजी विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संघाच्या अध्यक्षपदी अनिल मच्छिंद्र भोईटे, उपाध्यक्षपदी सौ. अनिता दत्तात्रय पवार (पूर्वाश्रमीच्या अनिता गणपत रणवरे), सचिवपदी मुख्याध्यापिका सौ. माधुरी ज्ञानेश्वर जाधव (पदसिद्ध) तर खजिनदारपदी नंदू शेठ नामदेव शेगर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनियुक्त अध्यक्ष अनिल भोईटे यांनी पदभार स्वीकारताना सांगितले की, माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश शाळा आणि माजी विद्यार्थ्यांमधील नाते पुन्हा मजबूत करून शालेय विकासाला गती देणे हा आहे. “शाळेचे गतवैभव पुनर्स्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
महाराष्ट्र शासनाच्या १ ऑक्टोबर २०२५ च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार शैक्षणिक दर्जा उंचावणे, समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवणे, माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे, तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
या प्रसंगी शाळेच्या उन्नतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. “शाळेतून घडलेले विद्यार्थी पुन्हा आपल्या मातृसंस्थेकडे वळून तिच्या प्रगतीत हातभार लावतील,” असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, महादेवराव रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संघाच्या सदस्यपदी ताराचंद्र आवळे, शरदराव रणवरे, यशवंत खलाटे पाटील, नंदकुमार भोसले, सारिका खलाटे (घाडगे), विजय मोरे, ज्योती पवार (दिवेकर), सुनिता शिंदे (बाबर), रोहिणी जाधव (अहिरेकर), दीपा गुजर (चव्हाण), रवींद्र गिरी, राणी उर्फ वैशाली रणवरे (बळे), अलका रणवरे (कारंडे), अनिकेत रणवरे, नवनाथ रणवरे, नंदकुमार रणवरे, नितीन रणवरे आदींची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच वडाच्या रोपाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ. माधुरी जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या जमदाडे, अंकुश सोळंकी, शाहीन हन्नुरे, अमोल जाधव, अर्चना सोनवलकर, मधुकर जगताप आदींनी परिश्रम घेतले.
या वेळी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.






