फलटण( आपलं फलटण) फलटण तालुक्यातील गुणवरे गावात बेकायदेशीर व केमिकल मिश्रित ताडी विक्रीचा धुमाकूळ सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीने अधिकृत निवेदन देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावात परप्रांतीय व्यक्तीकडून खुलेआम ताडी विक्री सुरू असून, या ताडीमध्ये केमिकल मिसळले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहे. काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, तर काही तरुण सतत झिंगलेल्या अवस्थेत असतात.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावडे-पाटील, युवा नेते पवन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा अधीक्षक कार्यालय तसेच फलटण येथील उप अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडेही अनेकदा तक्रारी केल्या; मात्र संबंधित ताडी विक्रेत्यांवर केवळ जुजबी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही ही बेकायदेशीर विक्री लपूनछपून सुरूच असल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला आहे.
“साहेब, कारवाईसाठी मुहूर्त कधी?”
ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाला थेट सवाल केला आहे. “निवेदन देऊनही कारवाई होत नाही, मग नेमका मुहूर्त कधी काढणार?” असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस निरीक्षकांनी तातडीने लक्ष घालून गुणवरेतील बेकायदेशीर ताडी विक्री कायमची बंद करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
🔲 चौकट : ‘गौड बंगाल’ नेमकं काय?
परराज्यातील इसम गावात येऊन सर्रास ताडीचा व्यवसाय करतो, केमिकलयुक्त ताडीमुळे युवक व्यसनाधीन होत आहेत, त्यांचे करिअर धोक्यात येत आहे—इतके गंभीर चित्र असतानाही प्रशासन मात्र शांत का?
निवेदन, तक्रारी, विरोध… सगळं काही होत असताना कारवाईचा मागमूस नाही, यामागे नेमकं कोणाचं संरक्षण आहे का? कि लक्ष्मी दर्शनाचा प्रभाव असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
युवकांचे भविष्य अंधारात जात असताना संबंधित यंत्रणा ‘कोमात’ का?हा खरा ‘गौड बंगाल’ ठरत आहे!






