फलटण (आपलं फलटण ) धर्माचे प्रवर्तक भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात जैन बांधवांनी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. संपूर्ण शहरात शांतता, अहिंसा व ‘जगा आणि जगू द्या’ या संदेशाचा जागर करण्यात आला.
यावेळी शहरातून पारंपरिक पालखी सोहळा व आकर्षक चित्ररथांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात भगवान महावीरांच्या अनुयायांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदविला. भगवान महावीरांच्या मूर्तीची पारंपरिक मिरवणूक हा जयंती उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरला.
शांतता व अहिंसेचा संदेश देणाऱ्या रॅलीने शहरवासीयांची मने जिंकली. या रॅलीमध्ये महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तसेच विविध सामाजिक उपक्रमही या निमित्ताने राबविण्यात आले.
जयंतीनिमित्त जैन मंदिरामध्ये विशेष पूजा, तसेच भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांद्वारे जैन समाजाने एकतेचा संदेश देत महावीरांच्या शिकवणीचा आदर्श समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, जयंतीनिमित्त आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी महावीर स्तंभ येथे उपस्थित राहून भगवान महावीरांना अभिवादन केले. धार्मिक वातावरणात आणि शांततेच्या संदेशासह फलटणमध्ये महावीर जयंती उत्साहात पार पडली.






