फलटण (आपलं फलटण)
मार्च महिन्यात फलटण तालुक्यात उन्हाचा चटका प्रचंड प्रमाणात जाणवू लागला असून, उन्हाळ्याची अधिकृत वर्दी देणारी ‘रसवंती गृहांची घुंगरे’ आता ठिकठिकाणी खुळखुळू लागली आहेत. सकाळपासूनच सूर्यदेव आग ओकू लागल्याने घसा ओला करण्यासाठी नागरिकांचे पाऊले रसवंती गृहाकडे वळू लागली आहेत.
फलटण-पुणे, फलटण-सातारा, पंढरपूर बारामती दहिवडी महामार्गांवर, छोट्या-मोठ्या मार्गावरील रस्त्याकडेला तसेच शहरातील चौका चौकात, गल्लीबोळात वर्दळीच्या ठिकाणी रसवंती गृहे थाटण्यात येत आहेत. काही ठिकाणी आजही बैलांच्या सहाय्याने चालवले जाणारे पारंपारिक घाणे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा तो लयबद्ध आवाजाचा नाद ऐकत थंडगार रसाचा आस्वाद घेणे, हा एक वेगळाच अनुभव प्रवाशांना मिळत आहे. बैलाच्या गळ्यातील घुंगराचा आवाज लुप्त होत असतानाच रसवंती ग्रहावर इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने घुंगराचा आवाज खुळखुळवला जात आहे.
वाढत्या उन्हामुळे शीतपेयांच्या (Cold Drinks) बाटल्यांपेक्षा निसर्गदत्त अशा उसाच्या रसाला नागरिकांनी अधिक पसंती दिली जात आहे. आल्याचा तिखटपणा, लिंबाचा आंबटपणा आणि पुदिन्याचा सुगंध असलेला हा रस शरीराला थंडावा देण्यासोबतच ऊर्जाही देतो. ‘ पंधरा-वीस रुपयांच्या बाटलीपेक्षा दहा- 15 रुपयांचा रसाचा पेला केव्हाही बरा’, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
गत काही दिवसापासून तापमानाचा पारा ३२ ते ३५ अंशांच्या पुढे जाऊ लागला आहे. त्यामुळे रसवंती चालकांच्या व्यवसायाला मोठी ‘बहार’ आली आहे. येत्या काळात उन्हाची तीव्रता अधिक वाढणार असल्याने रसवंती गृहांवर गर्दीचा ओघ आणखी वाढणार आहे.
’शुद्ध रसा’कडे कल
“सध्या भेसळयुक्त शीतपेयांचे पेव फुटले असताना, फलटणचा गोड ऊस आणि डोळ्यादेखत चरख्यातून निघणारा ताजा रस यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. प्रवासात उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी लोक आवर्जून थांबून रसाचा आस्वाद घेत आहेत.”
— सुरेश रोमन मुक्ताई रसवंती गृह फलटण






