फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी )ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध, शासकीय योजनांची माहिती आणि ग्रामपंचायतींचे महत्त्वाचे संदेश तात्काळ पोहोचविणारे प्रभावी माध्यम ठरलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा निधीअभावी येत्या ३० जूनपासून पूर्णपणे बंद होणार आहे. जिल्हा परिषद सातारा आणि सातारा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमास आवश्यक आर्थिक पाठबळ न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील १ हजार २३६ ग्रामपंचायतींमधील सुमारे ९ लाख ४५ हजार ग्रामस्थ या यंत्रणेशी जोडले गेले होते. ग्रामसभा, पाणीपुरवठा, करभरणा, वन्य प्राण्यांचा धोका, पूरस्थिती, आग, भूकंप, वणवे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना काही क्षणांत सतर्क करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरली होती.
या यंत्रणेचा मुख्य आधार असलेल्या टोल-फ्री क्रमांक १८००२७०३६०० वरून दिलेला संदेश काही सेकंदांत संपूर्ण गावातील नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचत होता. त्यामुळे संकटाच्या प्रसंगी गावकऱ्यांना एकत्र बोलावणे, आवश्यक सूचना देणे तसेच प्रशासनाशी समन्वय साधणे अधिक सुलभ झाले होते.
हजारो घटनांमध्ये बजावली महत्त्वपूर्ण भूमिका
गेल्या जवळपास तीन वर्षांच्या कालावधीत ग्राम सुरक्षा यंत्रणेचा तब्बल १८ हजार ४५० हून अधिक वेळा वापर करण्यात आला. चोरीचे प्रयत्न हाणून पाडणे, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, वणवे आणि आगी नियंत्रणात आणणे, पूरग्रस्तांना मदत करणे, संशयितांना पकडणे तसेच वनक्षेत्र आणि शेतीचे मोठे नुकसान टाळणे अशा अनेक घटनांमध्ये या यंत्रणेने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
उंब्रज परिसरात शस्त्रांसह आरोपींना पकडणे, शिखर शिंगणापूर येथे एटीएम चोरीचा प्रयत्न हाणून पाडणे, वानवली परिसरात चंदनचोरांना जेरबंद करणे, तसेच विविध गावांमध्ये ऊस, गायरान, जंगल आणि चाऱ्याला लागलेल्या आगी विझविण्यासाठी ग्रामस्थांना एकत्रितपणे सतर्क करण्यामध्ये या यंत्रणेची महत्त्वाची भूमिका राहिली. फलटण तालुक्यात डीपी चोरीच्या घटना रोखणे, हरवलेले नागरिक शोधणे आणि विविध गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्यासाठीही या सुविधेचा प्रभावी उपयोग झाला.
शासकीय विभागांसाठीही ठरली उपयुक्त
जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय विभागांनी ग्रामस्थांपर्यंत महत्त्वाच्या सूचना आणि योजनांची माहिती तात्काळ पोहोचविण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर केला. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत प्रशासनाचा संवाद अधिक वेगाने पोहोचत होता आणि आपत्तीच्या काळात मदतकार्याला गती मिळत होती.
निधीअभावी अखेर पडदा
ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित स्तरावर वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र ग्रामपंचायतींकडून आवश्यक आर्थिक तरतूद न होणे तसेच अपेक्षित प्रशासकीय पाठबळ न मिळाल्याने अखेर ३० जून २०२६ पासून संपूर्ण यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील लाखो ग्रामीण नागरिकांना संकटसमयी मदतीचा आधार ठरलेली आणि तात्काळ सूचना देणारी प्रभावी यंत्रणा बंद पडणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आपत्कालीन संपर्क व्यवस्था कमकुवत होण्याची भीती व्यक्त होत असून, ग्रामस्थांमधून यंत्रणा पुन्हा सुरू ठेवण्यासाठी शासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…








