फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी) : वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचा संदेश देत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विठ्ठलवाडी (ता. फलटण) येथे कृषीदूतांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी वृक्ष लागवडीबरोबरच त्यांच्या संवर्धनाचा संकल्पही केला.
गाव परिसर तसेच शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करताना उपस्थितांनी केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले.
यावेळी कृषीदूतांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनशैलीत पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे. पृथ्वीचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प केला पाहिजे. विठ्ठलवाडीतील ग्रामस्थांनी दाखविलेला उत्साह आणि सहभाग इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे गावात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी या मोहिमेचे उत्स्फूर्त स्वागत केले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नीतिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, धीरज पाटील, ओंकार गारगोटे, सोहम गरड, वैभवराज सुरवसे आणि तुषार ठेंगल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विठ्ठलवाडीतील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, हरित आणि स्वच्छ पर्यावरणासाठी सामूहिक सहभागाची गरज पुन्हा अधोरेखित झाली.








