फलटण (पोपट मिंड) – आगामी विधानपरिषद आमदारकीच्या उमेदवार निवडीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतून समांतर पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांकडून निंबाळकर घराण्यातील मात्र एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक नेतृत्वांना विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी दोन्ही निंबाळकरांचे समर्थक कार्यकर्ते प्रचंड आशावादी असल्याने तालुक्यात आमदारकीच्या “डबल धमाका”ची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
भाजपकडून माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा त्यांचे समर्थक कार्यकर्ते करीत आहेत त्यांच्या समर्थकांच्या मते, माढा लोकसभा मतदारसंघातील पराभवानंतरही रणजीतसिंह यांनी विकासकामांची गती मंदावू दिली नाही. फलटण तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणे, विविध पायाभूत सुविधा उभारणे आणि “फलटण जिल्हा” या दीर्घकालीन स्वप्नासाठी सातत्याने प्रयत्न करणे या बाबी त्यांच्या बाजूने ठळकपणे मांडल्या जात आहेत.
दुसरीकडे, भाजपमध्येच धैर्यशील कदम, शेखर गोरे आणि सत्यजितसिंह पाटणकर यांसारख्या इच्छुकांची नावे चर्चेत असल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत सर्वमान्य आणि संघटन वाढवणारा चेहरा म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी देणे हा “समतोल साधणारा पर्याय” ठरू शकतो, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
याच वेळी शिवसेनेकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव ठामपणे पुढे येत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी “हा शेवटचा पक्ष” अशी स्पष्ट भूमिका घेत शिवसेना संघटन बळकट करण्यावर भर दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केलेले काम, तालुक्यातील दांडगा जनसंपर्क आणि उद्योगक्षेत्रातील यश या त्यांच्या ताकदी मानल्या जात आहेत.
शिवसैनिकांच्या मते, संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानपरिषदेची संधी दिल्यास फलटणमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल. विशेषतः भाजपचा वाढता जनसंपर्क रोखण्यासाठी त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
* तुलनात्मक राजकीय समीकरण पाहिले तर
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माजी खासदार म्हणून व्यापक राजकीय आणि प्रशासकीय अनुभव असलेले नेतृत्व मानले जाते. त्यांनी माढा मतदारसंघात पराभवानंतरही विकासकामांची गती कायम ठेवत मोठ्या निधीची उभारणी केली आणि फलटण तालुक्यासाठी विविध पायाभूत प्रकल्प राबवले. त्यांच्या नेतृत्वात पक्षविस्ताराला प्राधान्य देत इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्यावर भर दिसून येतो. “फलटण जिल्हा” ही त्यांची दीर्घकालीन संकल्पना असून जिल्हा व मतदारसंघ पातळीवर त्यांचा प्रभाव लक्षणीय मानला जातो.
याउलट, संजीवराजे ना. निंबाळकर हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून स्थानिक पातळीवरील मजबूत पकड असलेले नेतृत्व आहे. त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवत संघटन बळकट करण्यावर भर दिला आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर त्यांचा दांडगा जनसंपर्क असून उद्योगक्षेत्रातील यशामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. शिवसेनेची ताकद वाढवणे आणि स्थानिक स्तरावर प्रभाव विस्तार करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट मानले जाते.
एकंदरीत फलटणमधील सध्याचे राजकीय चित्र हे केवळ उमेदवारीपुरते मर्यादित नसून “संघटन विरुद्ध संघटन” अशी थेट लढत असल्याचे दिसते. भाजपकडे विकासकामांचा आणि व्यापक नेटवर्कचा मुद्दा मजबूत आहे, तर शिवसेनेकडे तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेले नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव ही मोठी ताकद आहे.
जर भाजपकडून रणजितसिंह ना. निंबाळकर आणि शिवसेनेकडून संजीवराजे ना. निंबाळकर यांना एकाच वेळी विधानपरिषदेची संधी मिळाली, तर फलटणमध्ये “डबल आमदार” अशी अभूतपूर्व सकारात्मक स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे विकासकामांना गती मिळण्याची शक्यता जरी असली, तरी राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होण्याचीही चिन्हे आहेत.
फलटण तालुक्यातील आगामी राजकारणात निंबाळकर घराण्याचे वर्चस्व अधिकच अधोरेखित होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या निर्णयावर पुढील समीकरणे अवलंबून राहणार असून, “डबल धमाका” प्रत्यक्षात उतरतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी दोघांचेही कार्यकर्ते विधान परिषदेची आमदारकी मिळण्याबाबत प्रचंड आशावादी दिसून येत आहेत. जिल्ह्यातील वर्चस्ववादाच्या या लढाईमध्ये दोन्ही पक्षांनी सकारात्मक निर्णय घेतलाच तर फलटणच्या विकासाच्या राजकारणाची ढवळगाव प्रचंड गती घेईल असे म्हटलं तर वावगं होणार नाही.






