आपलं फलटण( प्रतिनिधी)
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवल्यामुळे फलटण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गंभीर बनले आहे. यंदा उन्हाळी पावसाचा पूर्णपणे अभाव राहिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तालुक्यातील ५१ गावे टंचाईग्रस्त घोषित केली असून त्यापैकी ५ गावे आणि २७ वाड्यावस्त्यांवर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
विशेष म्हणजे टंचाईग्रस्त गावांमध्ये बागायती पट्ट्यातील गावांचाही समावेश असल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित होत आहे. मान्सूनच्या आगमनास आणखी विलंब झाल्यास किंवा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून केवळ ९२ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महसूल विभागाने टप्प्याटप्प्याने टंचाई जाहीर केली असून २३ फेब्रुवारी रोजी ३२ गावांचा, ३० मार्च रोजी १० गावांचा आणि ५ जून रोजी आणखी ९ गावांचा टंचाईग्रस्त यादीत समावेश करण्यात आला. धुळदेव, झिरपवाडी, सोनवडी बुद्रुक, टाकळवाडे, मानेवाडी, मिरगाव, जिंती, मलवडी, खामगाव, जावली, मिरढे, हिंगणगाव, तांबवे, सासवड, घाडगेवाडी, दुधेबावी आदी गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती गंभीर बनली आहे.
दरम्यान, ६ जूनपासून दुधेबावी व त्याखालील ११ वाड्यावस्त्या, वाघोशी, सासवड व ५ वस्त्या, मानेवाडी व ४ वस्त्या तसेच मिरढे व ७ वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. नागरिकांना तसेच जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या फलटण तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून, लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास टंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.






