आपलं फलटण (धुळदेव प्रतिनिधी) ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून ज्ञानविनिमय अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत धुळदेव येथे कृषीकन्यांनी “शेतकरी गटाची निर्मिती, त्याचा योग्य वापर आणि मूल्यमापन” या विषयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमाला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रात्यक्षिकादरम्यान शेतकरी गटाची निर्मिती कशी करावी, गट स्थापनेसाठी आवश्यक असलेली टप्प्याटप्प्याने प्रक्रिया, गटामध्ये कृषीविषयक उपयुक्त चर्चा कशा घडवून आणाव्यात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बाजारभाव, हवामान अंदाज, पीक रोग व कीड नियंत्रण, शासकीय योजना आणि कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडींची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने कशी पोहोचवता येते, याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
यावेळी शेतकरी गटांचे नियमित मूल्यमापन करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. माहितीची गुणवत्ता, शेतकऱ्यांचा सहभाग, प्रतिसाद आणि गटाची परिणामकारकता वाढविण्यासाठी कोणत्या बाबींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, याविषयीही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी कन्या तेजश्री जाधव, वैभवी ननावरे, वैष्णवी वाघमारे, अस्मिता काटकर, सिद्धी धुमाळ, कावेरी पळसकर आणि सुवर्ण धंदाळे यांनी हा उपक्रम राबविला. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे तसेच कार्यक्रमाधिकारी प्रा. नीतीशा पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.
“डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना एकत्र आणणे आणि कृषी माहितीचे सशक्त जाळे निर्माण करणे ही काळाची गरज आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.






