फलटण ( आपलं फलटण ) फलटण तालुक्यातील सांगवी (माळेवाडी) येथील कचरे-शेंडे वस्ती परिसरात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आलेली सुमारे ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी अवघ्या सहा वर्षांत कोसळल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा उभारणीवर शासन निधी खर्च होत असताना अशा प्रकारे टाकी जमीनदोस्त होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
सन २०१९-२०२० मध्ये सुमारे एक हजार लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी ही योजना राबविण्यात आली होती. कचरे -शेंडे वस्ती व परिसरातील नागरिक या टाकीवरील पाणीपुरवठ्यावर अवलंबून होते. मात्र अचानक टाकी कोसळल्याने नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून सांगवी साठी एक कोटी 75 लाख 47 हजार 453 रकमेची योजना होती. माळवाडी येथे बांधलेल्या टाकीसाठी 11 लाख 83 हजार 915 रुपये खर्च आलेला होता तो सर्व खर्च टाकी कोसळल्यामुळे पाण्यात गेला
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, टाकीचे बांधकाम सुरू असतानाच कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. आरसीसी काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. तसेच भीमनगर येथील बॅलन्स टँकबाबतही सुरुवातीपासून तक्रारी होत्या. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
विशेष म्हणजे, टाकी कोसळलेली जागा गावातील दैनंदिन वाहतुकीच्या रस्त्यालगत आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी कोणीही त्या परिसरात नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा ही घटना गंभीर स्वरूप धारण करू शकली असती.
टाकी कोसळल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या सहा वर्षांत पाण्याची टाकी इतकी जीर्ण कशी झाली? कामाचा दर्जा तपासण्यात आला होता का? काम पूर्णत्वाचा दाखला देताना सर्व निकषांची पूर्तता झाली होती का? शासन निधीचा योग्य वापर झाला का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय पेय जल जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या दर्जाबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या घटनेतून धडा घेत भविष्यातील कामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सातारा व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सखोल चौकशीची मागणी केली असून अधिकारी, अभियंते किंवा ठेकेदार पदाधिकारी जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर पर्यायी पाणीपुरवठ्याची तातडीने व्यवस्था करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
चौकट : सभापती अधिकारी, अभियंते यांची घटनास्थळी धाव
पाण्याची टाकी कोसळल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तत्परता दाखवली. टाकी कोसळल्याची माहिती मिळताच बाकीचे कामकाज सोडून त्या घटनास्थळी दाखल झाल्या घटनास्थळावरून माहिती घेऊन तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे निर्देश दिले. यावेळी फलटणचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाश कुमार बोंबले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते तसेच जिल्हा पातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी केली.
ग्रामस्थांनी यावेळी अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचत निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी, दोषींवर कारवाई आणि पर्यायी पाणीपुरवठ्याची तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी केली. चौकशी अहवालानंतर नेमके वास्तव समोर येणार असले तरी या घटनेमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणीच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चौकट :सहा वर्षात टाकी कोसळली ग्रामस्थांचे थेट सहा प्रश्न
अवघ्या सहा वर्षांत पाण्याची टाकी कोसळण्यामागे नेमके कारण काय?
बांधकामाचा दर्जा तपासणारे अधिकारी कोण होते?
काम पूर्णत्वाचा दाखला कोणत्या निकषांवर देण्यात आला?
शासन निधीचा वापर नियमानुसार झाला का?
दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का?
नागरिकांसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था कधी होणार?






