फलटण (आपलं फलटण )आळंदी–पंढरपूर पालखी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात राजुरी चौफुला (तालुका फलटण )येथील गजानन रामचंद्र जाधव व त्यांच्या पत्नी सिंधुताई गजानन जाधव यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव दांम्पत्य हे पिंप्रद (ता. फलटण) येथे लग्नकार्यासाठी मोटारसायकलवरून जात होते. फलटणच्या दिशेने प्रवास करत असताना उलट्या दिशेने भरधाव आलेल्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडले.अपघातानंतर दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, फलटण येथे हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच बरड दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी अमोल चांगण घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करत संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, याच मार्गावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी स्वराने ट्र ट्रकला धडक दिल्याने विडणी येथील एकाचा अपघातात मृत्यू झाला होता. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे पंढरपूर–फलटण मार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे.मृत जाधव दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे. राजुरी चौफुला येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान अपघातात दांपत्य मृत्यू पावल्याने राजुरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत






