फलटण आपलं फलटण प्रतिनिधी :
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत विठ्ठलवाडी येथे कृषीदूतांनी यजमान शेतकऱ्यांना बँक कर्ज प्रस्ताव तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना शाश्वत शेती व्यवसायासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी कृषीदूतांनी बँक प्रकल्प अहवाल तयार करताना आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती दिली. शेतीचे अंदाजपत्रक, संभाव्य उत्पन्न, खर्च व नफा, आवश्यक साधनसामग्री, मशागतीचे नियोजन तसेच कर्जफेडीचे नियोजन याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
बँकेकडून कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक व आर्थिक निकषांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रकल्प अहवालाच्या माध्यमातून शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, कृषी यंत्रसामग्री, पशुपालन, फळबाग तसेच प्रक्रिया उद्योगासाठी बँकेचे कर्ज मिळविण्यास पात्र ठरू शकतात, असे कृषीदूतांनी सांगितले.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक व विषय अध्यापक प्रा. नीतीषा पंडित तसेच कार्यक्रम समन्वयक सौ. नीलिमा धालपे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात कृषीदूत साहिल आतकिरे, ओंकार गारगोटे, तुषार ठेंगल, वैभवराज सुरवसे, सोहम गरड, धीरज पाटील आणि सुमित शितोळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.





