आपलं फलटण( प्रतिनिधी ) फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने ‘बागायती पिकांमध्ये चौरसाकृती लागवड प्रणाली’ या विषयावरील प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमामध्ये चौरसाकृती लागवड पद्धतीचे विविध फायदे, योग्य नियोजन, लागवडीतील अंतर व्यवस्थापन तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर याबाबत शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः डाळिंब पिकासाठी चौरसाकृती लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती मिळाली.
या उपक्रमाला परिसरातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृषी कन्या साक्षी नाझीरकर, विद्या नवले, अस्मिता निवसे, जोगेश्वरी लोकरे, मोनाली कोळपे, श्रावणी भागवत आणि गौरी जाधव यांनी प्रशिक्षणाचे नियोजन व प्रात्यक्षिक सादरीकरणात सक्रिय सहभाग घेतला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, कार्यक्रम समन्वयक नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित तसेच प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, या प्रात्यक्षिकामुळे बागायती पिकांच्या उत्पादनवाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.





