सासकल येथे १३०० वृक्षांची लागवड; देवराई उभारणीच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण( आपलं फलटण )माणसाला पैसा वाढवण्याचा रोग लागला आहे. शेती, गाड्या आणि संपत्ती वाढवण्याच्या नादात पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे. मंत्री-पुढाऱ्यांचा नव्हे, तर झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि वृक्षसंवर्धनासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांचा आदर्श समाजाने घ्यावा,” असे प्रतिपादन अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सासकल (ता. फलटण) येथे भगवान मुळीक व अमोल मुळीक यांच्या शेतात आणि बांधावर १३०० जंगली व फळझाडांची लागवड करण्यात आली. काव्या अॅडव्हेंचर प्रा. लि. मुंबई, सह्याद्री देवराई, कृषी विभाग, वन विभाग आणि योद्धा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास उपवन संरक्षक अमोल सातपुते, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग प्रदीप सुर्वे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, वनक्षेत्रपाल मारुती निकम, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल विजय रामटेके, मंडळ कृषी अधिकारी अशोक जगदाळे, उपकृषी अधिकारी अजित सोनवलकर, कृषी सेवा रत्न सचिन जाधव, कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी बबन मुळीक तसेच पंचक्रोशीतील शेतकरी विषयाचे अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सयाजी शिंदे म्हणाले, “प्रत्येकाने आपल्या वयाइतकी झाडे लावली पाहिजेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ४० देवराया उभ्या राहिल्या असून शंभर देवराया निर्माण करण्याचा संकल्प आहे. झाडांसाठी पैसा कधी कमी पडत नाही; लोकच या कामासाठी पुढाकार घेतात. अमोल मुळीक यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी पुढे येऊन पर्यावरण संवर्धनाची चळवळ उभारली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “आज लाखो-कोट्यवधी रुपयांच्या गाड्या घेतल्या जातात; मात्र झाडे लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. गाड्या काही वर्षांत निकामी होतात, पण झाडे शंभर-दोनशे वर्षे मानवजातीला साथ देतात. त्यामुळे वृक्षारोपण आणि संवर्धन हीच खरी भविष्यातील गुंतवणूक आहे.”
फलटण परिसरातील वृक्षसंवर्धनाच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी डॉ. प्रसाद जोशी यांच्या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. “सातारा जिल्ह्यात चार-पाच आदर्श देवराया उभ्या राहतील. सासकल येथे उभ्या राहत असलेल्या देवराईसाठी मी दरवर्षी येणार आहे. या परिसरातील डोंगरकपारींमध्ये वनराईच्या माध्यमातून पंचवटी निर्माण करण्याचा संकल्प आहे,” असेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले, “पृथ्वी वाचवायची असेल तर मुळांचे कुळ स्वीकारावे लागेल. देवळे वाढत नाहीत; मात्र त्यांच्या आसपासची झाडे सतत वाढत असतात. पर्यावरण आणि पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही.”

पर्यावरण संवर्धनाच्या प्रश्नावर सरकारवर टीका करताना त्यांनी, “वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी अधिक व्यापक प्रयत्न होणे अपेक्षित असताना शासन या विषयात पुरेसे गांभीर्य दाखवत नाही,” असा आरोप केला.
यावेळी उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी देवराई संवर्धनाचे महत्त्व विशद केले, तर डॉ. प्रसाद जोशी यांनी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी केले. भगवान मुळीक व अमोल मुळीक या पिता-पुत्र शेतकऱ्यांच्या पुढाकारामुळे सासकल परिसरात पर्यावरण संवर्धनाची नवी चळवळ उभी राहत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






