फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी)
निरगुडी येथील महात्मा फुले नगर परिसरातील होलार समाज व बौद्ध वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संपूर्ण गावातील सांडपाणी दलित वस्तीतील भूयारी गटारातून सोडण्यात येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर परिसरात पावसाचे व सांडपाण्याचे पाणी घरांमध्ये घुसू नये यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले. मात्र, हे काम सुरू असतानाच गटारातून येणाऱ्या सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करण्याबाबत ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासनाला अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. तरीदेखील संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
परिणामी, गावातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिले असून परिसरात उग्र दुर्गंधी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र साचल्याने डासांची उत्पत्ती वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सांडपाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी सिमेंट पाईप टाकून निचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशासनाला वारंवार सूचना करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, “निरगुडी ग्रामपंचायत अजून किती दिवस दलित वस्तीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत राहणार?” असा संतप्त सवाल परिसरातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.







