फलटण ( आपलं फलटण वृत्तसेवा ) आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासह शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी फलटण नगर परिषदेने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे रस्ते अधिक प्रशस्त होत असून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दरवर्षी आषाढी वारीदरम्यान लाखो वारकरी फलटण शहरात मुक्कामासाठी आणि दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे पालखी मार्गावरील वाहतूक आणि गर्दीचे नियोजन करणे आवश्यक ठरते. याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली आहे.
मलटण भागापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. काही ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे हटविण्यात आली, तर अनेक व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य केले. काही अतिक्रमणधारकांनी साहित्य हलविण्यासाठी चार ते पाच दिवसांची मुदत मागितली असून प्रशासनाने त्यांच्याशी समन्वय साधत कारवाई सुरू ठेवली आहे.
नगर परिषदेने या मोहिमेसाठी एकाच वेळी तीन ते चार स्वतंत्र पथके कार्यरत केली असून पालखी मार्गावरील अनधिकृत शेड, फलक, हातगाडे आणि रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढत असून पादचारी व वाहनधारकांना दिलासा मिळत आहे.
मलटण येथील श्रीराम बाजार परिसरासह काही ठिकाणी पालखी मार्ग अरुंद होत असल्याने तेथील अतिक्रमणांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काही भागांमध्ये रस्त्यांची मूळ रुंदीच कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी अतिक्रमणे हटविल्यानंतर मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे नागरिकांचे मत आहे.
दरम्यान, केवळ पालखी मार्गच नव्हे तर शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणेही हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी आणि वाहतुकीच्या दृष्टीने अतिक्रमणमुक्त रस्ते ही काळाची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
एकंदरीत, पालखी मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहराला मोकळा श्वास मिळण्यास सुरुवात झाली असून वारकरी, नागरिक आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
चौकट : पुनर्वसनालाही प्राधान्य — नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर
अतिक्रमण हटविण्याबरोबरच प्रभावित होणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचाही नगर परिषद सकारात्मक विचार करीत आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या गाळ्यांमधून आणि उपलब्ध जागांमधून पात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. शहराचा विकास, वारकऱ्यांची सुविधा आणि सर्वसामान्यांच्या उपजीविकेचा समतोल राखत अतिक्रमणमुक्त फलटण घडविण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.







