फलटण (आपलं फलटण) राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील सुमारे १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया या कार्यक्रमानुसार पार पडणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात केलेल्या सुधारणांनुसार नागरिकांच्या मागासवर्गासाठी आरक्षणाची मर्यादा २७ टक्क्यांपर्यंत ठेवण्यात आली असून एकूण आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचाही या प्रक्रियेत विचार करण्यात आला असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
०८/०६/२०२६ (सोमवार) : विशेष ग्रामसभेची सूचना देऊन आरक्षणाची सोडत काढण्याची कार्यवाही.
१२/०६/२०२६ (शुक्रवार) : विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढणे. (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चिती)
१७/०६/२०२६ (बुधवार) : प्रभागनिहाय आरक्षण प्राप्त अहवालाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता.
१९/०६/२०२६ (शुक्रवार) : प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप प्रसिद्ध करणे.
१९/०६/२०२६ ते २५/०६/२०२६ : आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी.
०३/०७/२०२६ (शुक्रवार) : प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अभिप्राय देणे.
०८/०७/२०२६ (बुधवार) : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायावर अंतिम अहवालाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता.
१०/०७/२०२६ (शुक्रवार) : जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेला अंतिम आरक्षण आराखडा व्यापक प्रसिद्धीस देणे.





