फलटण( आपलं फलटण) विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने दिव्यांग बांधवांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली असून, “मागण्या पूर्णपणे कृतीतून मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दिव्यांगांसाठी महसूल विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या जागांचा प्रत्यक्ष ताबा अद्याप संबंधित लाभार्थ्यांना मिळालेला नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंजूर जागांचा तात्काळ ताबा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
तसेच, संजय गांधी निराधार योजना विभागात पूर्णवेळ अधिकारी उपस्थित नसल्याने लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित अधिकारी गौण खनिज विभागात कार्यरत असल्याने संजय गांधी विभाग “नावाप्रमाणेच निराधार” बनल्याची तीव्र प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या विभागात कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध करून दिव्यांगांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मे २०२५ मध्ये झालेल्या नैसर्गिक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप वितरित झाले नसल्याने संबंधित अनुदान तात्काळ देण्यात यावे, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी केली.
याशिवाय, संजय गांधी विभागातील नियुक्त कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, दिव्यांग बांधवांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले मूलभूत प्रश्न मार्गी लावावेत, अशा विविध मागण्याही आंदोलनाद्वारे पुढे करण्यात आल्या.
उपोषणाच्या प्रारंभी तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. सात जणांनी प्रत्यक्ष उपोषणात सहभाग घेतला आहे. सकाळपासून आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा खेद आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
सागर गावडे,
महेश जगताप -(दिव्यांग ),
ज्ञानदेव काशीद -(दिव्यांग),
योगेश जाधव
दत्तात्रय पवार-( दिव्यांग) हे पाच जण बेमुदत उपोषणास बसले आहेत






