फलटण (आपलं फलटण) भारती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या प्राथमिक परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित ‘श्रीराम विद्याभवन’ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी अनया किशोर पवार हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत फलटणच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
भारती विद्यापीठाचे आजीव सदस्य रविंद्र बेडकिहाळ तसेच भारती विद्यापीठ, खारघर (मुंबई) येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई जाधव यांच्या हस्ते अनया पवार हिचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. आगामी काळात भारती विद्यापीठाच्या पुणे येथील विशेष बैठकीत अनयाचा स्वतंत्र सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
“अनया पवार हिने राज्य पातळीवर शाळेचे आणि संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे,” असे गौरवोद्गार सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ यांनी काढले. ते पुढे म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि गणित विषयात सक्षम व्हावे, या दूरदृष्टीतून डॉ. पतंगराव कदम यांनी १९६४ मध्ये भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. अनयासारख्या विद्यार्थ्यांनी त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवले आहे.
प्राचार्या वैशालीताई जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि नियमित सराव यामुळेच मोठे यश संपादन करता येते. आयुष्यातील अडचणींवर मात करत पुढे जाण्याची प्रेरणाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी विशेष प्राविण्य संपादन केलेल्या श्रेयश संकपाळ, भूमी गायकवाड, श्रावणी अहिवळे, आस्था विश्वकर्मा, ध्रुव कळंबे, राजवीर मोरे, अवनी जाधव आणि यलुबाई जाधव या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी स्वागत केले, सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले. अनया पवार व अन्य यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






