आपलं फलटण( प्रतिनिधी )
“पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यावश्यक आहे. मात्र झाडे लावण्याइतकेच त्यांचे संगोपन करणेही महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आयुष्यात किमान एका झाडाचे जतन करण्याचा संकल्प केला, तर भावी पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि समृद्ध पर्यावरणाचा वारसा देता येईल. असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी केले
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील रोपवाटिका (Nursery Management) मॉड्यूलच्या विद्यार्थ्यांनी नक्षत्र गार्डन परिसरात तब्बल २ हजारांहून अधिक देशी वृक्षांची लागवड करून आदर्श वृक्षारोपण मोहीम राबविली.
या अभियानाचा शुभारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मोहिमेत वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, करंज, आवळा, बोधिवृक्ष, हिरवा चाफा, सोनसावर, नांदरुक, साग, मोहगनी, कापूर व मोहा आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. हे वृक्ष स्थानिक हवामानाशी सुसंगत असून प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासह जैवविविधतेचे संवर्धन आणि पक्षी-जीवसृष्टीस आश्रय देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व प्रा. ए. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास श्री. तुषार नाईक निंबाळकर उपस्थित होते. तसेच कृषी सहायक श्री. अक्षय सोनवलकर आणि चतुर्थ वर्षातील रोपवाटिका मॉड्यूलच्या विद्यार्थ्यांनी नियोजन, वृक्षलागवड व परिसर सुशोभीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले.
या वृक्षारोपण मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.





