आपलं फलटण (प्रतिनिधी) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया विषयावरील प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करून आधुनिक शेतीतील महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती दिली.
यावेळी कृषीकन्यांनी बीज प्रक्रिया म्हणजे काय, तिचे महत्त्व आणि पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया का आवश्यक आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बियाण्यांना रोग, किडी व बुरशीजन्य प्रादुर्भावापासून संरक्षण मिळावे, उगवण क्षमता वाढावी तसेच पिकांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वाढ व्हावी यासाठी बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रात्यक्षिकादरम्यान जैविक व रासायनिक बीज प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची माहिती देण्यात आली. तसेच योग्य प्रमाण, वापरण्याची पद्धत आणि घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कृषी क्षेत्रात शाश्वत उत्पादनवाढीसाठी आणि गुणवत्तापूर्ण पीक घेण्यासाठी बीज प्रक्रिया हा महत्त्वाचा घटक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शेतकऱ्यांनीही विविध प्रश्न विचारून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. नीतीषा पंडित तसेच वनस्पती रोग विज्ञान विषयाचे विशेष मार्गदर्शक प्रा. पी. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
कृषीकन्या विद्या नवले, साक्षी नाझीरकर, श्रावणी भागवत, जोगेश्वरी लोकरे, अस्मिता नेवसे, मोनली कोळपे आणि गौरी जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले.








