फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी) सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सातत्यपूर्ण प्रसार या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, मंगळवार पेठ, फलटण या संस्थेने आपल्या स्थापनेची यशस्वी ३६ वर्षे पूर्ण केली आहेत. तर संस्थेच्या शैक्षणिक उपक्रम असलेल्या प्रबुद्ध विद्याभवन या प्राथमिक शाळेलाही ३२ वर्षांचा गौरवशाली टप्पा गाठता आला आहे. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्याचा आढावा घेण्यात आला.
२ जून १९९० रोजी स्थापन झालेल्या या मंडळाने गेल्या तीन दशकांहून अधिक काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले. आदर्श व्यक्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, व्याख्यानमाला, चर्चासत्रे, तसेच ‘विचार’, ‘भीमक्रांती’ आणि ‘परिवर्तन’ या पत्रकांचे प्रकाशन करून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले.
धम्मक्रांती सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने सलग ३६५ दिवस ‘भीमविचार मंथन’ हा अभिनव उपक्रम राबविला. त्यानंतर प्रत्येक रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणांचे सामूहिक वाचन हा उपक्रम सलग १४ वर्षे अखंड सुरू राहिला. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत १५ व्या वर्षापासून फेसबुकच्या माध्यमातूनही भाषण वाचनाचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार देश-विदेशातील समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यात संस्थेला मोठे यश मिळाले.
सामाजिक जागृतीबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही मंडळाने मोलाची कामगिरी बजावली आहे. १९९० मध्ये एसएससी विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासवर्ग, १९९१ मध्ये सावित्रीबाई फुले बालवाडी, १९९२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, १९९३ मध्ये प्रबुद्ध बालवाडी आणि १९९४ मध्ये प्रबुद्ध विद्याभवन ही मान्यताप्राप्त प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. या उपक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.
विशेष बाब म्हणजे, मंडळाचा संपूर्ण प्रवास हा समाजाच्या स्वयंस्फूर्त सहकार्याच्या बळावर उभा राहिला आहे. कोणत्याही मोठ्या आर्थिक पाठबळाशिवाय छोट्या व्यावसायिक, मजूर आणि कामगार वर्गाने दरमहा दिलेल्या अल्प आर्थिक योगदानातून हे कार्य फुलत गेले. अनेक कार्यकर्त्यांनी स्वतः व्यवसायांच्या ठिकाणी जाऊन मदत संकलित करण्याची जबाबदारी पार पाडली.
संस्थापक सचिव दत्ता अहिवळे यांनी सांगितले की, “पूर्णपणे समाजावलंबी पद्धतीने काम करताना मोठ्या प्रमाणावर भौतिक विकास साधता आला नसला तरी सामाजिक प्रबोधन, शैक्षणिक उन्नती आणि वैचारिक जागृतीचे भक्कम कार्य उभे राहिले आहे. आज मंडळ आणि प्रबुद्ध विद्याभवन ही फलटणची ओळख बनली असून राज्य, देश आणि विदेशात विखुरलेल्या बांधवांपर्यंत या कार्याचा इतिहास पोहोचविण्यासाठी संस्थेच्या प्रवासाची क्षणचित्रे लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.”
आंबेडकरी विचारांचा सातत्यपूर्ण प्रचार, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक बांधिलकी यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि प्रबुद्ध विद्याभवन यांनी फलटणच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी आणि आदर्शवत ओळख निर्माण केली आहे. स्थानिक स्तरावर सुरू झालेला हा विचारप्रवाह आता जागतिक स्तरावर पोहोचत असून, त्याची प्रचिती लंडनमध्ये साजऱ्या करण्यात आलेल्या भीम जयंती आणि भीमस्फूर्ती पुरस्कार वितरण सोहळ्यातूनही दिसून आली आहे.








