आपलं फलटण प्रतिनिधी : पावसाळ्याची चाहूल लागत असताना घरामध्ये साठवून ठेवलेल्या धान्याचे विविध किडींपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत विठ्ठलवाडी येथे कृषीदूतांनी शेतकऱ्यांना धान्य साठवणूक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून धान्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासह आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
धान्य साठवणुकीदरम्यान सोंडे कीड (राईस वीव्हील), लेसर ग्रेन बोरर, कॉरसायरा पतंग आणि खापरा भुंगा यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडी धान्याच्या आत शिरून ते पोखरतात. परिणामी धान्याचे वजन कमी होते, उगवणक्षमता घटते तसेच पौष्टिक मूल्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे साठवणीपूर्वी धान्य व्यवस्थित वाळवून स्वच्छ आणि कोरड्या ठिकाणी साठवण्याचे आवाहन कृषीदूतांनी केले.
यावेळी शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि घरच्या घरी करता येणाऱ्या धान्य संरक्षणाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कृषीदूतांच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
हा उपक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय फलटण यांच्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्पांतर्गत राबविण्यात आला. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नीतिशा पंडित तसेच विशेष मार्गदर्शक प्रा. माधुरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत साहिल आतकिरे, सुमित शितोळे, धीरज पाटील, ओंकार गारगोटे, सोहम गरड, वैभवराज सुरवसे व तुषार ठेंगल यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला.
चौकट
धान्य साठवताना घ्या ही काळजी
धान्य पूर्णपणे वाळवूनच साठवावे.
कोरड्या व स्वच्छ ठिकाणी साठवणूक करावी.
पोत्यांची नियमित तपासणी करावी.
किडींचा प्रादुर्भाव दिसताच तातडीने नियंत्रण उपाययोजना कराव्यात.
बियाणे म्हणून वापरावयाचे धान्य स्वतंत्र ठेवावे.






