आपलं फलटण /तांदूळवाडी, प्रतिनिधी :
म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांवर रविवारी काळाने घाला घातला. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात त्यांच्या पिकअप (टमटम) वाहनाचा भीषण अपघात होऊन वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले. या हृदयद्रावक दुर्घटनेत लहान मुले व महिलांसह ८ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पंढरपूर–म्हसवड मार्गावरील तांदूळवाडी येथे वाहनात अचानक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. अपघाताच्या वेळी वाहनात एकूण १५ भाविक प्रवास करत होते. सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या अपघातात सिद्धेश्वर पोपट जाधव, चालक सागर चौगुले, अपूर्व अमोल सातोरे, आरव अमोल सातोरे, बालाजी बावचे, शशिकला पोपट जाधव आणि संदीप बावचे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर पूजा अमोल सातोरे, ताई बावचे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, सार्थक संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, गणेश बालाजी बावचे तसेच बालाजी बावचे यांचा लहान मुलगा यांचा या भीषण दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच तांदूळवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनास्थळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, तहसीलदार सचिन लंगुटे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तांदूळवाडी परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात होत असल्याचा दावा केला आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव असून, विहिरींना संरक्षक कठडे नसल्याने गंभीर धोका निर्माण होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सिद्धनाथ दर्शनाचा आनंद क्षणात शोकांतिकेत बदलल्याने रांजणी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका कुटुंबासह अनेक घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
तांदूळवाडी अपघातातील प्राथमिक आकडेवारी
वाहनातील एकूण प्रवासी : १५
मृत्यू : ८
जखमी : ७
अपघातस्थळ : तांदूळवाडी, ता. माळशिरस
मूळ गाव : रांजणी, ता. पंढरपूर






