आपलं फलटण: प्रतिनिधी पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजातील प्रश्नांना वाचा फोडत लोकहित जपावे आणि सत्य, निर्भीड व वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा अधिक बळकट करावी, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिश पाटणे यांनी केले. ग्रामीण भागातील पत्रकारांना मोठ्या प्रमाणावर अधिस्वीकृती मिळवून देण्याचे भाग्य आपल्या कार्यकाळात लाभत असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारी प्रतिष्ठेची पत्रकार अधिस्वीकृती पत्रिका (अॅक्रेडिटेशन कार्ड) साप्ताहिक फलटण नायकचे संपादक तथा पत्रकार मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना हरिश पाटणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सातारा जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा गौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, गोरख तावरे, सातारा जिल्हा माहिती कार्यालयाचे राहुल पवार, फलटणचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष भांबुरे, रोहित वाकडे, शेखर जगताप, अरुण जायकर यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सातारा जिल्ह्यातील अशोक इथापे (देगाव) आणि अरुण जायकर (वाघोली, कोरेगाव) यांनाही अधिस्वीकृती पत्रिका प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना हरिश पाटणे म्हणाले, “अधिस्वीकृती पत्रिका हे केवळ ओळखपत्र नसून पत्रकाराच्या विश्वासार्हतेचे, जबाबदारीचे आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. संघटनेचा अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील पात्र पत्रकारांना न्याय देण्याचा संकल्प केला होता. विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळताना मनस्वी समाधान लाभत आहे.”
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविणारे मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी फलटण नायक या साप्ताहिकाच्या माध्यमातून फलटण तालुक्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील समस्या, सर्वसामान्यांच्या अडचणी आणि विकासात्मक विषय प्रभावीपणे मांडून त्यांनी पत्रकारितेत वेगळा ठसा उमटविला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना अधिस्वीकृती पत्रिका प्रदान केल्याने फलटण तालुक्यासह पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या सन्मानामुळे फलटण नायक परिवार आणि वाचकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत अधिक जबाबदारीने पत्रकारितेचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार काकासाहेब खराडे यांनी व्यक्त केला आहे.
चौकट :
ग्रामीण पत्रकारितेला नवे बळ
महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती पत्रिकेमुळे फलटण नायकचे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांच्या पत्रकारितेची अधिकृत दखल घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान फलटण तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.





